मुंबई: अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याने युतीतील सत्तास्थापनेचा पेच कायम राहिला. त्यातच देशात स्थिर सरकार देणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार झाल्याने त्याला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला व सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना कळवल्याचे समजते.

भारतीय जनता पक्षाचे चाणक्य अमित शहा आश्चर्यकारकरीतीने शांत राहिले आहेत. बहुधा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अमित शहा पुढाकार घेऊन भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करतात; परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत अमित शहा यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य मानले जात आहे. अखेर अमित शहा हा तटस्थपणा सोडून रविवारी दुपारी सक्रिय झाले. त्यांनी तात्काळ भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रात पाठविले. अमित शहा मुंबईला गेले नाही, तर त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना मार्गदर्शन केले. पंधरा दिवसांत पहिल्यांदा अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात थेट दखल दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकूनही भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्ता स्थापन करण्यापासून दूर राहावं लागलं आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाची मागणी कायम ठेवली होती. मात्र, भारतीय जनता पक्षानं नकार देत थेट सत्ता स्थापन करणार नाही, असं राज्यपालांना कळवलं. त्यानंतर शिवसेनेकडून सत्तेस्थापनेसाठी सुरू झाल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

त्यापूर्वी शिवसेना भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेना खासदार संजय राऊत सोमवारी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या चर्चेनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल, असे सांगितले जाते आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.

भाजपाच्या कोअर कमिटीचीही आज महत्वपूर्ण बैठक