मुंबई : लोकसभा संपून भाजप सरकार बहुमताने सत्तेत आले आणि मंत्रिमंडळ वाटप पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येतो आहे. एका बाजूला विधानसभेत दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते युतीसाठी प्रयत्न करत असताना काही नेत्यांकडून आग लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी काळात या विषयावरून भाजप सेनेमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने वर्धापन दिनानिमित्त ‘सामना’च्या अग्रलेखातून पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात अनेक संकल्प करण्यात आले होते. याच अग्रलेखावरुन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. अवधूत वाघ यांनी ट्विट करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला असून एकप्रकारे शिवसेनेला मुख्यमंत्री पदावरून झिडकारण्याचं राजकारण सुरु केलं आहे.
अवधूत वाघ ट्विट करून नेमकं काय म्हणाले?
“कोण काय म्हणतं, कोण काय छापतं, याला काहीही महत्त्व देऊ नका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जागा पुढील पाच वर्षांसाठी रिकामी नाही.” असे म्हणत भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
कोण काय म्हणतं, कोण काय छापत.. काहीही महत्त्व देऊं नका…
There is no vacancy for the post of @CMOMaharashtra , at least for the next 5 years for sure.— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) June 19, 2019
