मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाजनादेश यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि पक्षासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठक सुरु आहेत.

लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले म्हणून समाधान मानू नका. ते मताधिक्य तुम्हाला नाही, मोदींना दिले आहे. ५ वर्षातील कामाचे मूल्यमापन करूनच विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रसाद नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी फडणवीस यांनी आमदारांना निवडणुकीतील उमेदवारीचा निकष काय असेल याची स्पष्ट कल्पना दिली. लोकसभेच्या वेळी आपल्या विधानसभा मतदारसंघातील मते ही तुमची आहेत असे समजू नका. मताधिक्य दिले म्हणून उमेदवारी मिळेल या भ्रमात राहू नका, असे फडणवीस यांनी ठणकावून बजावले.

ते मताधिक्य तुमच्यामुळे नाही, मोदींमुळे मिळाले; उमेदवारी मिळेलच या भ्रमात राहू नका: फडणवीस