मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची अट ठेवल्याने भारतीय जनता पक्षाला पुन्हा युतीची सत्ता स्थापन करण्यास अडचणी आल्या आहेत. यामुळे उद्या सध्याच्या फडणवीस सरकारची मुदत संपुष्टात येणार असल्याने त्यांनी आज राजीनामा दिला आहे. यानंतर फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9
— ANI (@ANI) November 8, 2019
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भारतीय जनता पक्ष हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
सत्तास्थापनेत मोठी कोंडी निर्माण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेसोबत समसमान सत्तावाटपाबाबत काहीही ठरलं नव्हतं, असा दावा विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य करताना दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा करायची नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आपलं वक्तव्य मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाकडून ड्राफ्टही तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे.
