नागपूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पराभूत करण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस पक्ष सध्या अनुकूल असल्याचे संकेत काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिले आहेत. चव्हाण नागपुरात सोमवारी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे ही प्रतिक्रिया नोंदवली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या पाश्र्वभूमीवर अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी विचारणा केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यात पक्षात मतभिन्नता होती. मात्र, आता पक्षाचे मत परिवर्तन झाले आहे. दरम्यान गरज भासल्यास आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचा आक्षेप नसल्यास काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असे देखील चव्हाण म्हणाले.

विद्यमान पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राजीनामा दिला. त्यानंतर देशातील इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे देशभर राजीनामासत्र सुरू आहे. मात्र सर्व काही लवकरच सुरळीत होईल असा आशावाद देखील अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवला. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू असून उमेदावारीसाठी अनेक इच्छुक आहे. पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणूक लढेल. कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल (संयुक्त) सरकार पाडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करीत आहे. आमदार फोडून त्यांना आणण्यासाठी मुंबईहून बंगळुरूला विशेष विमान पाठवण्यात आले, असेही ते म्हणाले.

ईव्हीएमबद्दलचे सर्व मुद्दे आम्ही मांडले आहे. ईव्हीएमबद्दल मोठा संशय आहे, मात्र आज आमच्याकडे पुरावे नाहीत. मात्र, एक ना एक दिवस सत्य जगासमोर येईल, असा दावा त्यांनी केला. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यपदाचा मागील महिन्यात राजीनामा दिला. पक्ष नवीन अध्यक्ष निवड करेपर्यंत ते प्रभार सांभाळत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मतभिन्नता होती, पण आता मत परिवर्तन झाले आहे: अशोक चव्हाण