गडचिरोली : गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ मोठा भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात तब्बल १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी समस्त पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात पंधरा जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. घटनास्थळी नक्षली आणि पोलिसांची चकमक सुरु असल्याचे समजते.
