सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जेव्हा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होऊन जातो, असं ते म्हणाले. शिवाय त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं समर्थनही केलं. मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची अपेक्षा करणं हा मूर्खपणा असल्याचंही ते म्हणाले. जगभरात सीएए कायदा आहे, मग भारतातच का नको? भारतीयांना जोडणाऱ्या या कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोपही संभाजी भिडे यांनी केला.

या कायद्याच्या समर्थनार्थ सोमवार शिवप्रतिष्ठानच्यावतीने सांगलीत मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भिडे म्हणाले की, राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर नेहमीच स्वार्थी भूमिका घेतली जाते. स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारे लोकच त्यात आघाडीवर आहेत. मुळात हिंदू समाजात राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर नपुसंकता आहे. ही गोष्ट आताची नाही, तर शेकडो वर्षापासून हेच घडत आहे. केंद्र सरकारने कलम ३७०, तिहेरी तलाक आणि आता नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणून देशाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही मंडळी या कायद्याचा अपप्रचार करत, देशात दंगली घडवत आहेत.

तत्पूर्वी संभाजी भिडे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य केलं होतं. आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे दुर्दैव आहे. स्वार्थ हाच धर्म असणारे कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यामुळे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे. देशभक्त असणारा प्रत्येक नागरिक या कायद्याचं समर्थन करेल. याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

 

Web Title:  Hindu Community get Impotent upon Nationality Issue says Sambhaji Bhide.

‘राष्ट्रीयत्वा’वर हिंदू समाज नपुंसक होऊन जातो : संभाजी भिडे