पुणे : अति घाई संकटात नेई हे सर्वांना परिचित असेलच पण त्याचा प्रत्यय पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमावेळी भाजपला आला आहे. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभाराच जिवंत चित्र समोर आलं आहे.
पुणे महानगर पालिकेच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण होण्याआधीच ५० कोटी खर्चून उभ्या राहत असलेल्या या इमारतीच्या कामाच्या दर्जाची जाहीर कबुलीच निसर्गाने उपस्थितांना करून दिली आहे. कारण उदघाटनाच्या कार्यक्रमा दरम्यान बाहेर जोरदार पाऊस सुरुवात झाली आणि त्याच वेळी प्रमुख पाहुण्यांची भाषणं सुरु झाली व नव्या कोऱ्या सभागृहात पाण्याची गळती सुरु झाली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला कानाडोळा केला खरा, परंतु थेट घुमटातून गळणाऱ्या पाण्याचा आवाज होऊ लागला आणि सर्वत्र एकाच चर्चा रंगली.
महत्वाचं म्हणजे शहरातील महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवकांच्या आसनावर पाणी गळत असल्याने आसनावर चक्क पेपर अंथरून पाण्याची गळती झाकण्याचा केविलवाणा प्रयत्नं झाला आणि छायाचित्र सुद्धा प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे भाजपचे कौतुक होईल या उद्देशाने घाईघाईने केलेल्या उदघाटनामुळे उलट भाजप टीकेचे धनी ठरले आहेत.
