मुंबई, २७ जून | जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर केवळ तुमचाच अधिकार आहे तर थोडं थांबा! खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या अधिकारासंदर्भात अनेक नियम आणि कायदे अस्तित्वात आहेत. प्रकरण इतकं साधं-सरळ नाही. दिल्ली हायकोर्टात नुकतीच एक खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने सांगितलं की वडिलांच्या मालमत्तेवर पूर्णपणे मुलाचाच हक्क नसतो. कारण आई अजून जिवंत आहे आणि मालमत्तेवर मुलीचाही तेवढाच हक्क आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या एका गृहस्थाच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेची वाटणी झाली. कायदेशीररीत्या त्या संपत्तीचा अर्धा हिस्सा हा पत्नीला आणि अर्धा हिस्सा मुलांमध्ये (एक मुलगा आणि एक मुलगी) वाटण्यात येणं अपेक्षित होतं. पण जेव्हा मुलीनं संपत्तीतला आपला हिस्सा मागितला, तेव्हा मुलानं (तिच्या भावानं) तो देण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीनं कोर्टाचं दार ठोठावलं. आईनंही मुलीला पाठिंबा दिला. मुलानं म्हटलं की मलाच पूर्ण संपत्ती मिळायला हवी. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने हिंदू वारसाहक्क कायद्यांतर्गत निर्णय दिला. कोर्टानं निर्णय दिला की अजून आई जिवंत आहे आणि तुम्हाला बहीण देखील आहे.
त्याबरोबर न्यायालयानं मुलाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यामुळं आईला मानसिक त्रास सहन करावा लागला त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला. आजच्या काळात असं प्रकरण होणं काही नवं नाही, असं भाष्य कोर्टानं केलं. पण यातून निष्कर्ष काय काढावा?
वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क?
तसं पाहायला गेलं तर समाजात वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा मुलगाच मानला जातो. 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा झाली, त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे, असं निश्चित झालं. हिंदू कुटुंबांमध्ये मुलगा हाच घराचा कर्ता मानला जात असल्यामुळे 2005 आधी कायदा तसा होता.
जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी 20 डिसेंबर 2004 पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क नाही. कारण या प्रकरणात संपत्ती वाटपात जुने नियम लागू होतील. ही वाटणी रद्द करता येणार नाही. हा कायदा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजाला लागू होतो.
वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?
संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे तुम्ही कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित. कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो.
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये कुणाकुणाचा वाटा असतो?
वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा बरोबरीचा वाटा असतो. जर कुणाच्या कुटुंबात तीन मुलं असतील तर पहिली वाटणी तीन मुलांमध्ये होईल. आणि तिसऱ्या पिढीच्या मुलांना (त्या व्यक्तीची नातवंडे) ती संपत्ती आपल्या वडिलांच्या हिश्शातून मिळेल, असं कायदेतज्ज्ञ सौम्या सक्सेना सांगतात.
तिन्ही मुलांना आपल्या वारसाहक्काप्रमाणे एक तृतियांश संपत्ती मिळेल आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी होईल. मुस्लीम समाजात ही संपत्तीच्या वाटणीची पद्धत वेगळी आहे. जोपर्यंत त्या पिढीची अंतिम व्यक्ती जिवंत असते, तोपर्यंत त्या संपत्तीची वाटणी होत नाही.
वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे काय नियम आहेत?
वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे नियम कडक आहेत, कारण या संपत्तीमध्ये अनेक हिस्सेदार असतात. त्यामुळे विकताना अनेक अडचणी येतात. वाटणी झाली नसेल तर कुटुंबातली कोणतीही व्यक्ती ती स्वतःच्या मर्जीने विकू शकत नाही. वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणं आवश्यक आहे.
दुसरी पत्नी असेल तर…?
हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करण्याची परवानगी पुरुषांना नसते. जर पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीर मानलं जातं. अशा स्थितीत दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क असतो, पण त्या व्यक्तीला वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीवर त्यांचा हक्क नसतो.
वडिलोपार्जित संपत्ती नसेल तर त्यावर कुणाचा हक्क?
जर तुमची संपत्ती वडिलोपार्जित नसेल, म्हणजे ती तुम्हीच कमावलेली असेल, तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची, याचा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे. तुमच्या जिवंतपणी किंवा तुमच्या पश्चात ती संपत्ती तुम्ही कुणाच्याही नावे करू शकता.
जर मृत्युपत्र नसेल तर?
सौम्या सांगतात, “वारसाहक्काने मिळालेली संपत्ती वगळता, जी तुम्ही कमवलेली आहे, त्या संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा हक्क असतो. जर त्या व्यक्तीचे आई-वडील जिवंत असतील आणि ते देखील त्यांच्यावर उपजिविकेसाठी निर्भर असतील तर त्यांना देखील त्यातून हिस्सा मिळतो.
जर माता-पितांना हिस्सा नको असेल तर त्यांची जबाबदारी उचलून कोणताही वारसदार ती संपत्ती घेऊ शकतो. दिवाणी कायद्याच्या कलम 125मध्ये देखभालीचा उल्लेख आहे. यानुसार त्या व्यक्तीवर अवलंबून असलेली पत्नी, आईवडील आणि मुलं त्या व्यक्तीच्या संपत्तीवर आपल्या उपजीविकेसाठी कायदेशीररीत्या दावा करू शकतात,” असं त्या सांगतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: How much right does a daughter have over her parent’s property news updates.
