मुंबई : बहुजनांच्या मतांचे विभाजन टाळून विधान सभा निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्र बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्यावेळी बहुजनांच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत न्या. बी जी कोळसे पाटील आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर लक्ष्मण माने यांनी देखील नाराजी व्यक्त करत प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राज्यांतील विविध बहुजनवादी पक्ष तसंच संघटनांना एकत्र आणण्यासाठी जनता दलाचे राष्ट्रीय महासचिव न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यांतील १०० हून अधिक नोंदणीकृत पक्षांच्या आणि ५० संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सर्वसमावेशक स्वरूपाची महाराष्ट्र बहुजन आघाडी स्थापना केली आहे. न्या. पी. बी. सावंत या आघाडीची औपचारिक घोषणा सोमवारी दुपारी दोन वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात करणार आहेत. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी न्या. कोळसे पाटील, लक्ष्मण मानेसह गणेश देवी, नागेश चौधरी, मिलिंद पखाले यांच्यासह अनेक पक्षांचे प्रमुख उपस्थित असणार आहेत.
लोकसभा निवडणूकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीने समविचारी आणि पुरोगामी पक्षांना पाठिंबा द्यायला हवा होता. परंतु तसं न केल्याने प्रतिगामी पक्षांना त्याचा फायदा झाला. याबाबत वंचित बहुजन आघाडीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत अनेक वर्षे भारिप मध्ये काम करणारे तसेच वंचित बहुजन आघाडी मध्ये सक्रिय काम करणारे राज्यातील अनेक महत्वाचे पदाधिकारी बाहेर पडून या नव्या आघाडीत सामील होणार आहेत.
