मुंबई: महाराष्ट्रात ३५० हून अधिक गडकिल्ले हे इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या गडकिल्ल्यांना निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं आहे. या गडकिल्ल्यांवर अनेक तरुण तरुणी जात असतात. पण त्यापैकी काही इतिहास समजून न घेता केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी गडकिल्ल्यांवर जातात. त्या ठिकाणी जाऊन दारुच्या पार्ट्या करत हुल्लडबाजी करतात. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने अनिल देशमुख यांनी गडकिल्ल्यांवर दारु पिणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अशाप्रकारे हुल्लडबाजी करणाऱ्यांना सश्रम कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याच म्हटलं आहे.

राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मद्यपान करणारे आता कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहेत. कारण गड-किल्ल्यांचे पावित्र राखण्यासाठी तिथे मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्याचा अधिकृत शासकीय अध्यादेशही गृहमंत्रालयाने शनिवारी काढला. या अध्यादेशानुसार, गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास १०,००० रुपयांचा दंड आणि ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते.

मागील काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली होती. शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणार, यासारखा दिवाळखोरी विचार कुठलाही नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. तसेच गडकिल्ल्यांची डागडुजी करून त्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर सरकारनं आता गडकिल्ल्यांवर मद्यपान करण्यास बंदी घातली आहे.

 

Web Title:  Maharashtra State Government banned drinking alcohol on fort Home ministry ordinance released.

सरकारकडून गडकिल्ल्यांवर मद्यपान करण्यास बंदी; शिक्षेची तरतूद