मुंबईः भाजपाची अब की बार २२० पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांना जनतेनं पराभूत केले. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. श्रीनिवास पाटील जनतेचं प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे. निवडणुकीच्या निमित्तानं मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले. मोदी शहांच्या दौऱ्याचा राज्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. नव्या समीकरणाबद्दल सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच ठरवणार आहे, असं पवार म्हणाले आहेत.
Nationalist Congress Party (NCP) President, Sharad Pawar: NCP-Congress and other allies will decide together, the future course of action. We will not go with Shiv Sena. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/JAr4WaWFVP
— ANI (@ANI) October 24, 2019
२०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला होता. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या धक्क्यांच्या सामना करावा लागला होता. अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर झंझावाती दौरे केले होते. त्यांच्या या दौऱ्यांना मोठं यश मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामाही दिला होता. त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भर पावसात शरद पवार यांनी घेतलेल्या सभेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, भाजपध्ये प्रवेश घेतला, तेव्हाच उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा प्रवेशाची तजवीज करून ठेवली होती, असं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत जर पराभव झाला, तर भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवायचं भाजपनं उदयनराजेंना कबूल केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळेच ते राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याची शक्यता आहे.
