मुंबई: भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी राज्यात युतीसाठी पूरक असे वातावरण सध्यस्थितीत दिसत नाही. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप पक्षाच्या बंडखोरांनी युतीच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. या बंडखोरांचा फार मोठा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांना असणार आहे. दरम्यान, आज म्हणजे सोमवारी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज बंडखोरांची मनधरणी करण्यात शिवेसेना आणि भाजपला यश आले नाही, तर त्याचा मोठा फटका युतीच्या उमेदवारांना बसणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपकडून २७ मतदारसंघात तब्बल ११४ जणांनी बंडखोरी केली आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भाजपचे सर्वाधिक ९ बंडखोर आहेत. तर कल्याण पश्चिमेत भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली असून पूर्वेला भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांना शिवसेनेच्या धनंजय बोराडे यांची बंडखोरी कायम आहे. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांच्या विरोधातही शिवसेना उभी ठाकली आहे. तर भिवंडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार एकमेकांसमोर असल्याने अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हान कायम आहे.
ठाणे जिल्ह्यातील युतीच्या घोषणेमुळे हक्काचा कल्याण पश्चिमेचा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. नरेंद्र पवार यांना विरोध करणारी पक्षांतर्गत मंडळीही यामुळे दुखावली असून त्यांनी शिवसेनेच्या विश्वनाथ भोईर यांना विरोध सुरू केला आहे. पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून हक्काच्या भाजप मतदारांना आपलेसे करण्यात पवार यशस्वी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर पवार यांचे आव्हान उभे राहिले असून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ पातळीवरून बंड मागे घेण्यासाठी शिष्टाई करण्यात आली होती. परंतु तरीही पवार उमेदवारीवर कायम आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर त्यांचे तगडे आव्हान आहे. तर कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड भाजपच्या चिन्हावर लढत असले तरी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे धनंजय बोराडे यांनी बंड केले आहे. बोराडे अपक्ष लढत असले तरी त्यांना समजावण्यासाठी जिल्हा नेतृत्वाकडून प्रयत्न झाला. परंतु त्याला बोराडे बधलेले नाहीत. तर कल्याण पूर्व मतदारसंघाने आत्तापर्यंत अपक्षाला साथ दिली असल्याने गणपत गायकवाड यांच्या समोरील आव्हान वाढले आहे.
दोन वेळा उमेदवार पराभूत झाला असताना भाजप-शिवसेनेत जागांची अदलाबदल होणे अपेक्षित होते. नांदगावची जागा ही शिवसेनेच्या कोट्यात असली तरी येथे सलग दोन वेळा उमेदवारांचा पराभव झाला होता. ही जागा भाजपला मिळेल, या आशेवर नाशिक जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, माजी आमदार संजय पवार, भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ हे गेल्या एक वर्षापासून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. तिकडे पालिकेतील शिवसेना गट नेते गणेश धात्रक यांना पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल, असे वाटत होते. त्यामुळे ते देखील कामाला लागले होते. मात्र जागांची अदलाबदल झाली नाही आणि त्यामुळे निवडणुकीची तयारीला लागलेल्या भाजपच्या तिन्ही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यांनी बंड पुकारला आहे. शिवसेनेने सुहास कांदे यांना उमेदवारी दिल्याचे पाहून नाराज झालेले गणेश धात्रक यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली. उद्या, सोमवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यात शिवसेनेने देखील बंडखोरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. आता भाजप व शिवसेनेचे बंडोबा या इशाऱ्यानंतर ही मैदानात राहतात की थंडोबा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे विदयमान आमदार रमेश लटके यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी याच मतदारसंघातून भाजपचे तगडे माजी नगरसवेक मुरजी पटेल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने रमेश लटके यांची वाट खडतर झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.
