औरंगाबाद : “इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का?” असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे. “धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय?” असा सवाल राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात उपस्थित केला होता. तसंच राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देत, सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली.

मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. त्यावेळी त्यांनी घुसखोरांसह मशिदीवरील भोंग्यांबद्दलही भाष्य केलं होतं. ‘धर्म प्रत्येकानं घरात ठेवायला हवा. मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत. आमची आरती कोणाला त्रास देत नाही. पण नमाजाचा त्रास होतो. नमाज पठण करण्यास आमची हरकत नाही. पण भोंगे लावून कशाला?,’ असं राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा जलील यांनी समाचार घेतला. ‘शिवसेना आता धर्मनिरपेक्ष झाली आहे. त्यांनी काँग्रेस व एनसीपी’च्या सोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता हिंदुत्वाचा मुद्दा कोण हाती घेणार, असा प्रश्न होता. तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला आहे. हे केवळ राजकारण आहे. त्यांना हे आधी का आठवले नाही,’ असं खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते. तसेच धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. तसेच समझौता एक्स्प्रेस बंद करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली. देशात उभे राहिलेले मोहल्ल्यांचे उदाहरण देत उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर देशातल्या शत्रूंशीच लढावं लागेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

 

Web Title:  MIM Aurangabad MP Imtiaz Jaleel criticized MNS Chief Raj Thackeray over his statement on loudspeaker over Mosque.

शिवसेना धर्मनिरपेक्ष झाल्याने मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला: खा. इम्तियाज जलील