मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात २२ नोव्हेंबरला इतिहास घडला कारण होतं पहिल्यांदाच राज्याच्या एखाद्या मुख्यमंत्र्याने सकाळी महाराष्ट्र झोपेत असताना लपून-छपून शपथविधी उरकला होता. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसच्या एकीने भारतीय जनता पक्षाला चांगलीच राजकीय अद्दल घडविल्याचं पाहायला मिळालं आणि त्यात सुप्रीम कोर्टाने देखील संविधानिक पद्धतीने निर्णय दिल्याने भाजपाची राजकीय हशा झाल्याचं संपूर्ण देशाने पाहिलं आहे.

मात्र कालचा जाहीर शपथविधी सोहळ्यावरून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी ट्विट करत फडणवीसांना टोला लगावत म्हटलं आहे, “लोकं झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी ! जय महाराष्ट्र” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेन्शन केलं आहे.

दरम्यान, फडणवीसांनी आता आपल्या पक्षाने सर्वकाही लोकशाही पद्धतीने केल्याचा आव आणण्यास सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. कालच्या शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मात्र त्यावर भारतीय जनता पक्षाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करताना म्हटलं आहे, “या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?……मात्र अनेक लपून-छपून अनेक गोष्टी म्हणजे अगदी शपथविधी देखील उरकून घेणाऱ्या फडणवीसांनी ‘लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का?’ असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे हास्यास्पद म्हणावे लागेल. त्यात मोदी-शहा देशाला ७० वर्षाचे दाखले देत असताना, आम्हाला थोडा वेळ लागेल असं सांगत असताना, दुसरीकडे फडणवीसांना मात्र एकाच बैठकीत सर्व निर्णयांची एकदम घाई झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकं झोपेत असताना शपथविधी नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करत फडणवीसांना टोला