मुंबई : लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येताच मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला लेखी पत्र लिहून मतदारांची माहिती ‘आधार’ला जोडावी अशी विनंती केली आहे. मात्र यापूर्वी आधारचा डेटा चोरी झाल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यामुळे याच पत्राला अनुसरून मतदाराची महत्वाची माहिती किती सुरक्षित यावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.

यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करून अनेक शंका व्यक्त केल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘याची गरज काय? ह्यातील धोके काय ? याचा फायदा काय ? निवडणूक आयोगानं असं करावं का? निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून मतदारयादी आधार कार्डशी लिंक करावी अशी मागणी केली आहे, तर आधार कार्डची माहिती खाजगी संस्थांकडे गेल्याची माहिती आपल्याला आहे. त्यामुळे आधार आणि निवडणुकीशी संबंधित मतदार यादी जोडली तर ती माहिती परदेशी व्यापारी संस्थांकडे जाईल का? त्यामुळे मतदारांच्या सखोल आणि विस्तृत माहितीचा गैरवापर होईल का? मतदारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न होईल का? असा प्रश्न सुद्धा शिदोरे यांनी उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी इतिहासात ते अगदी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील अनेक वेळा मतदार यादीत घोळ होते आणि बोगस मतदान झाल्याचाही अनेक तक्रारी समोर आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे खरा मतदार बाजूला राहतो त्याला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे मतदार यादीत पारदर्शकता यावी यासाठी जर मतदारयादी आधार कार्डशी लिंक केली तर या घटनांना आळा बसेल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मतदार यादी आधार कार्डशी लिंक करण्याची मागणी केली आहे.

मतदारांची माहिती आधार’ला जोडावी; मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयोगाला पत्र: मनसेकडून शंका