मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात यंदा ऐतिहासिक दुष्काळ पडला असून अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हात वणवण भटकत आहेत. राज्यातील सत्ताधारी नेतेमंडळी अजून लोकसभा निवडणुकांच्या वातावरणातच अडकून आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी अनेक वृत्त वाहिन्यांवर एक्झिट पोलच्या गप्पा मारण्यासाठी तासंतास स्टुडियोमध्ये वेळ देत आहेत. मात्र सत्तेत असून देखील त्यांच्याकडे दुष्काळ दौऱ्यासाठी वेळ नसल्याचे दिसते.
दरम्यान आज दुष्काळसंदर्भातमनसेच्या शिष्टमंडळाने मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये मनसेकडून दुष्काळग्रस्त भागात राज्य सरकारकडून उपाययोजना करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि दुष्काळाचे गांभीर्य देखील सरकारच्या कानी घालण्यात आले.
मागील काही दिवसांपासून शेतकरी प्रश्नांवर आक्रमक होण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मनसे प्रयत्न करत असल्याचं सांगितले जातंय. मागील आठवड्यात ठाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने मोर्चा काढला होता.
चंद्रकांत पाटील आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या भेटीमध्येही दुष्काळग्रस्त भागातील उपाययोजनाबाबत सूचना मांडण्यात आल्या. या मागण्या मंत्र्यांनी मान्य करत ताबोडतोब कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. या बैठकीला मनसे शिष्टमंडळात नेते जयप्रकाश बाविस्कर, सरचिटणीस शालिनी ठाकरे, संतोष नागरगोजे, बापू धोत्रे, विठ्ठल लोखंडकर, अशोक तावरे, अरविंद गावडे आदी उपस्थित होते.
काय आहेत मनसेकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या?
- दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार अंमलबजावणी करणे.
- महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीमुळे गुरांना चारा छावणी तथा नागरिक व जनावरांना पाण्याची सोय येत्या ८ दिवसात करून देण्याचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणे.
- दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
- केंद्र सरकारच्या आदेशानुसार आलेल्या दुष्काळ निधीच्या विनियोगासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून तालुकानिहाय केलेल्या खर्च हिशोबाची माहिती मिळावी.
