मुंबई : मुंबईचे पूर्वीचे मालक आणि राबणारे हात म्हणजे तत्कालीन गिरणी कामगार, मात्र सध्या राज्याचे नवनियुक्त गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हाडाच्या बैठकीत केल्याने विधानाने गिरणी कामगारांमध्ये संतापाची भावना आहे. बैठकी दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत, अशी सूचना करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट गिरणी कामगारांच्या घरांबाबत देखील धक्कादायक सल्ला दिला आहे. गिरणी कामगारांना सुद्धा बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे म्हाडाच्या बैठकीत विखे कोणताही मागचा पुढचा विचार न करता म्हणाले.
‘म्हाडा हा विश्वासार्ह ब्रँड आहे. लोकांचा म्हाडावर खूप विश्वास आहे. त्यामुळे म्हाडाने मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे बांधावी. मुंबईत म्हाडाच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना अधिक गतिमान करावे’, असे देखील विखे यांनी सुचवले. ‘म्हाडाकडे असलेल्या मुंबईतील ५६ वसाहतींमधून अधिकाधिक प्रकल्प उभे करणे सुरूच राहील. परंतु आता त्यावर देखील मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच आता परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडाने मुंबईबाहेरचा रस्ता धरावा. तसेच ग्रामीण क्षेत्रात घरे बांधण्यास प्रधान्य द्यावे असे सूचित केले.
गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर द्यावीत यासाठी अनेक आंदोलन झाली, मात्र गिरणी कामगारांना नवी मुंबई, उरण, बेलापूर भागातील नैना गृहप्रकल्पात घरे द्यावीत’, अशा सूचना विखे पाटील यांनी कोणतीही पार्श्वभूमी विचारात न घेताच दिल्या. विशेष म्हणजे गिरणी कामगारांच्या नावाने मतांचं राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे नेते देखील या बैठकीला हजर होते, मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, म्हाडा मंडळाचे सभापती मधू चव्हाण, विनोद घोसाळकर, बाळासाहेब पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी दीपेंद्रसिंह खुशवाह, दिनकर जगदाळे, शिवशाही पुनर्वसन कंपनीच्या संचालक डॉ. निधी पांड्ये आदी अधिकारी उपस्थित होते.
