बीड: आमदार, खासदार पक्ष सोडून जात असल्यानं काहीशा बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच त्यासाठी मैदानात उतरले असून त्यांनी आज बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची अचानक घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी भाजप-शिवसेनेला टक्कर देण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्यासह सर्व तुल्यबळ मोहरे मैदानात उतरवले आहेत.

शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. बीड जिल्ह्यात आज पवारांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार, परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व केजमधून नमिता मुंदडा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार आहेत.

याशिवाय गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार यांनी हा पाच नाव जाहीर केली असून आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

विकास करण्यासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो, असं म्हणणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर शरद पवारांनी जोरदार टीका केली. पंधरा वर्षे मंत्रीपदी असताना जयदत्त क्षीरसागर यांनी नेमकं काय केलं, असा सवालही त्यांनी विचारला. केशरबाई क्षीरसागर यांनी गांधी नेहरु यांचा विचार कधी सोडला नाही. मात्र त्यांच्या पोराने स्वार्थासाठी आम्हाला सोडलं, असं म्हणत पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला. संदीप क्षीरसागर यांना आशीर्वाद द्या, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.

बीडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची शरद पवारांकडून घोषणा