मुंबई, १३ ऑगस्ट | आगामी महापालिका निवडणुकांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील या निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे समोर येण्याची शक्यता आहे. अशातच एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.
जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप:
हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला आहे.
इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले:
‘महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान यापूर्वीच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचा पलटवार:
त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला होता. हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीने हा पलटवार केला आहे.
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे असा चिमटाही त्यांनी काढला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: NCP leader Nawab Malik reply to MNS Chief Raj Thackeray news updates.
