पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना आणि भाजप मध्ये जाण्याचं सत्र सुरू आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत खोचक टीका केली आहे. भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
नेमकं काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी
“संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं.”
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतरावर भाष्य केलं आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणत आहे. सत्तेचा वापर करत विरोधी नेत्यांवर सरकारी कारवाई करण्याची भीती दाखवत आहेत, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
