परळी: मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. २७ जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे. पाच वर्षांत जे केलं त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर पंकजा मुंडे यांनी हल्लाबोल केला. परळीत माझ्याविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला ताकद देण्यात आली, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. मात्र त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेणं टाळलं. पंकजांच्या या आक्रमक भाषणावर धनंजय मुंडे यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिउत्तर दिलं असून ‘पेल्यातलं वादळ पेल्यातच शमेल’ अशा शब्दांत पंकजांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंनी भाष्य केलं.
गेले १२ दिवस टीव्ही लावला तर रोज संजय राऊत दिसायचे. ते जे बोलले ते करुन दाखवलं. पण मी मी काही बोलले नाही तरी माझंच नाव दिसायचं असं सांगत यावेळी त्यांनी पंकजाविषयी चांगलं नाही बोललं पाहिजे यासाठी काही लोकांना नेमलं होतं असा आरोप केला. तसंच सुत्रांची खिल्ली उडवताना, “इतके हुशार सूत्र असतील तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कळला कसा नाही. सुत्रांचीही मर्यादा असा टोला देखील पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांना लगावला.
‘माझ्यावर पदासाठी दबावाचा आरोप केला जात असेल तर मी आता भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य नाही, भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून चंद्रकातदादा मी मुक्ती मागत आहे,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील दुख:ला वाट मोकळी करून दिली आहे.
मी कुणाकडेही काही मागणी करणार नाही, माझी कोणाकडून काही अपेक्षा नाही. काही जण म्हणतात, पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत, प्रदेशाध्यक्षपद, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी दबाव आणू पाहत आहेत, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलेलं आहे.
१ डिसेंबरपूर्वी दररोज टीव्हीवर संजय राऊत दिसायचे. परंतु त्यानंतर सर्वत्र फक्त पंकजा मुंडे दिसू लागली, केवळ माझ्याबाबतची चर्चा सुरू आहे, नाथाभाऊ म्हणाले तसं आम्हाला ढकलत ढकलत दारापर्यंत आणलं, मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का उठल्या? मी उत्तर देणार नाही, पक्ष उत्तर देईल, पराभवाने खचणारी मी नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनीही स्वपक्षीयांनाच घरचा आहेर दिला आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केले. पण त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तात बेईमानी नसल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मला भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. मी पक्ष सोडणार नाही, हवं तर पक्षाने मला सोडावं असं आव्हान भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला देत आपल्या राज्यातील दौऱ्याची घोषणा पंकजा यांनी केली.
Web Title: NCP MLA Dhananjay Mundes Reaction on BJP Leader Pankaja Mundes Aggressive Speech at Gopinathgad
