नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअ अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जवळीक वाढल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात न उतरता राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजप विरोधात आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला पोषक वातावरण त्यांच्या सभांमधून निर्माण केलं. मात्र त्याचा स्वतःला फायदा करून घेण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची टीम कमी पडली होती.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आत्तापासूनच मनोधर्य हरल्यात जमा असून पक्षाला निवडणुकीच्या प्रचारासाठी चेहेराच शिल्लक नाही आणि त्यात राहुल गांधी प्रचारासाठी आले तरी काहीच फायदा होणार नाही हे देखील नक्की आहे. त्यात काँग्रेसची सध्याची भयानक राजकीय अवस्था पाहता वंचित आघाडी देखील त्यांची खिल्ली उडवत त्यांनाच उलट जागावाटपाचा संदेश पाठवत आहे. वास्तविक जो काँग्रेसमध्ये जाईल त्याचं देखील आगामी विधानसभा निवडणुकीत नुकसान होणार हे निश्चित आहे. त्यात नवनिर्वाचित राज्य प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे निवडणुकीत कोणतं वादळ निर्माण करणार आणि त्याच्यासभांना स्वतः काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तरी जमतील का याची शास्वती देता येणार नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातील फूट दुर्लक्षित करून दुसऱ्याबाजूला जोरदार प्रचार सुरूच ठेवून आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नक्की कुठे हरवली आहे अशी चर्चा रंगली आहे. किंबहुना प्रसार माध्यमं देखील राज्य काँग्रेसला दुर्लक्षित करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला सध्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष विधानसभा निवडणुकीत प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आणि प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसेल अशी सध्याची राजकीय परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे राष्टवादी देखील काळाची गरज ओळखून काँग्रेसला राम राम करत मनसेसोबत वेगळी चूल मांडून, काँग्रेसला वंचित आघाडीसोबत जाण्यास वाट करून देत आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.
त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे-राष्ट्रवादी युती होण्याचीही दाट चर्चा आहे. मागील काही दिवसांत या दोन्ही पक्षांच्या वाढलेल्या जवळीकमुळे नेत्यांच्या भाषणातही याची प्रचिती येते. नाशिकमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंचे केलेले कौतुक हे आगामी विधानसभेसाठी मनसेला घातलेली साद आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, राज्यात सगळीकडे पक्षबदलाचं वारं वाहू लागलं आहे. आमच्याकडे सत्ता असो वा नसो मात्र प्रत्येक टीव्ही चॅनेलच्या हेडलाइन्समध्ये दोनच पक्ष चर्चेत असतात. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर दुसरा राज ठाकरेंचा मनसे असं त्या म्हणाल्या.
