मुंबई : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी चालवली आहे, तर फडणवीस सरकारला अधिवेशनातच कोंडीत पकडण्यासाठी एनसीपीने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आज दिवसभरात विधिमंडळात जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळतील.
मंगळवारी सरकारकडून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बजेट सादर करण्यात आला. यावेळी अर्थसंकल्प सादर होत असताना कॅबिनेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटरवर घोषणांच्या निरनिराळ्या पोस्ट करण्यात येत होत्या. त्यामुळे अर्थसंकल्प आधीच फुटला असल्याचा गंभीर आरोप करत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. विधानपरिषदेत रामराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव केल्याचा आरोप राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. दरम्यान सभापती हे कोणत्याही पक्षाचे नसतात, परंतु रामराजे विरोधकांना झुकते माप देत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतचे भाष्य यावेळी पाटील यांनी केलं आणि चर्चांना अधिक उधाण आल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने अविश्वास ठराव आणल्यास रामराजेंच्या अडचणी वाढू शकतात. गत काळात स्थानिक स्वराज्य संस्थांतील पराभवामुळे काँग्रेस-एनसीपीच संख्याबळ आधीच कमी झालं आहे. त्यामुळे रामराजे यांना विधानपरिषद सभापती म्हणून आपलं पद कायम राखणं अत्यंत अवघड होऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी एनसीपीकडून या विषयाला अनुसरून रणनीती आखण्यात येत आहे. रणनीती ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे.
