मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माझी शिवसैनिक नारायण राणे यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यातून वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. खुलासे म्हणण्यापेक्षा विवादित खुलासे म्हणायला काही हरकत नाही, त्यास कारण देखील तसेच आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून बराचसा इतिहास उलगडला आहे, हा इतिहास फार कमी लोकांना माहित आहे.
२००६ साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तसेच शिवसेना सोडण्या आगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. दौऱ्याचे कारण म्हणजे आपल्या मागे किती लोकांचे पाठबळ आहे हि त्याची पूर्ण चाचणीच होती. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेस त्यांच्यासोबत शिवसेनेतील काही नामांकित चेहरे देखील राज ठाकरेंसोबत बाहेर पडले आणि त्यांना नवीन पक्ष उभारणीसाठी पाठिंबा दिला. शिवसेनेतील बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर असे अनेक चेहरे त्यावेळेस राज ठाकरेंसोबत बाहेर पडले.
२००६ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी नवीन पक्ष स्थापन करून एकत्रित काम करण्याचे निमंत्रण मला दिले होते असा खुलासा नारायण राणेंनी केला आहे. मात्र, मी त्यांना नकार दिला असल्याचा खुलासा नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून मधून करण्यात आला आहे. राज यांनी शिवसेना सोडण्यापूर्वीच राणे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र ‘ केला होता.
शिवसेनामधून आपल्याला का काढण्यात आले याबाबत नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून खुलासा झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, आता राज यांच्याबद्दल झालेल्या नवीन गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून अजून काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
