नागपूर: राज्यातील सत्तापेच कठीण बनला असताना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली असताना, आज गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येत आहेत.

मुंबईत सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे. तो सुटत नसताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री नागपुरात दाखल झाले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांना सत्तासंघर्षाची माहिती दिली. त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालकांना भेटणार आहेत. स्वर्गीय विलास फडणवीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘जिव्हाळा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजता सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. तिथे दोघेही उपस्थित राहणार आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या घडामोडींशी संबंधित असलेल्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. घोडेबाजाराच्या घाडेरडया राजकारणात पडू नका. दीर्घकाळाचा विचार करता भारतीय जनता पक्षासाठी ते हिताचे राहणार नाही असे भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्यापेक्षा विरोधी पक्षात बसा; आरएसएस’चा सल्ला?