मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भारतीय जनता पक्षाची मंत्रिमंडळ स्थापन्याबाबतची होणारी बैठक रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे.

संजय राऊत म्हणाले, “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्रीच जर स्वतः म्हणत असतील की फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नाही तर आम्ही या बैठकीत कशावर चर्चा करायची. कशासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायचं. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठकच रद्द केली आहे.”

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देऊ, असे कधीच कबूल केले नव्हते. १९९५चा फॉर्म्युला येईल वगैरे असे काहीही होणार नाही, मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असे अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधली धूसफूस आणखी वाढली आहे.

५०-५०च्या चर्चा झाल्या नसल्याचं मुख्यमंत्रीच बोलतात मग बैठक कशाला हवी: शिवसेना