मुंबई: महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय (Supreme Court of India Order) देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.

‘महाविकास’आघाडी (Mahavikasaghadi Meet) झालेल्या निर्णयानुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ (Oath Ceremony as Chief Minister of Maharashtra) घेणार आहेत. दरम्यान, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे त्यांना आमदारकीची शपथ देणार आहेत.

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे.

दरम्यान, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आमदारकीच्या शपथविधीपूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले आणि विधानभवनाकडे निघाले. विधानसभावनात प्रसार माध्यमांशी ते म्हणाले की, ‘युवा म्हणून काम करताना सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. विधानभवनात पहिल्यांदाच आलो आहे. आम्हाला महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. मंत्रिमंडळाबाबत निर्णय सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील, असं मत आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

एका बाजूला वडील राज्यातील मुख्यमंत्री या सर्वोच्च पदावर विराजमान होतं असताना, स्वतः देखील आमदार म्हणून विधानसभेत जाणार आहेत. राज्य चालवताना प्रशासकीय पद्धत आणि त्याचा अनुभव अत्यंत महत्वाचा असतो. स्वतः वडील राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतं असल्याने आदित्य ठाकरेंना देखील प्रशासकीय पातळीवरील कार्यपद्धत समजून घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. याचा फायदा त्यांना भविष्यातील राजकारणात होणार हे निश्चित आहे. केंद्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर सरकारच्या माध्यमातून कामं मार्गी लावायची असतील तर उत्तम प्रशासकीय ज्ञानाची अत्यंत आवश्यकता असते आणि नेमकी तीच संधी आदित्य ठाकरेंना चालून आल्याने, ते या संधीचा कसा फायदा भविष्यातील वाटचालीस करून घेतात ते पाहावं लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आमदार आदित्य ठाकरेंना मिळणारा प्रशासकीय अनुभव कामी येणार