मुंबई : शिवसेनेला देशपातळीवर राजकारण करायचं आहे, केरळमधील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने अमर्थता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न देण्यामागे शरद पवारांनी सोनिया गांधी यांनी दिलेली माहिती हेच कारण असल्याचं समजतं. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली गतीमान असताना, सोमवारी सायंकाळी ६ वाजता शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली होती.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन १५ मिनिटे चर्चा झाली होती. त्यावेळी, पवारांच्या सांगण्यावरुनच सोनिया गांधींनी शिवसेनेला पत्र देण्यास नकार दिल्याचं समजते. सरकार बनविण्यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून सत्ता बनविण्याचा प्रस्ताव देण्यात आला नसल्याचे पवार यांनी सोनिया गांधींना म्हटले. त्यामुळेच, सोनिया गांधींनी समर्थनाचे पत्र शिवसेनेला देण्याचा निर्णय लांबणीवर ढकलला, अशी माहिती आहे.

तत्पूर्वी, राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीत आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर करता आलं नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली आहे. परंतु पत्र देण्यावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रानं काहीही झालं नसतं. आम्हीदेखील काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढल्यानं दोघांनीही एकत्र हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. काँग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. काँग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, असं पवार यावेळी म्हणाले.

तर दसुरीकडे शरद पवार यांच्या सांगण्यामुळेच एक दिवस पुढे ढकलला असल्याची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच यापूर्वीच भारतीय जनता पक्षानं आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,परंतु सत्तास्थापनेबाबत अजूनही काँग्रेसचा निर्णय न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सत्तास्थापनेबाबत आमचा निर्णय झाला आहे. आम्ही काल दिवसभर काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होतो. पण काँग्रेसने कुठलाही निर्णय घेतला नाही. यावर आमची काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली आहे. यामुळे आम्ही एकटे निर्णय घेऊ शकत नाही, असं अजित पवार यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं.

शिवसेनेने समर्थन तर मागितलं पण प्रस्ताव सादर न केल्याने समर्थनाचं पत्रं लांबलं?