मुंबई: युतीचा फॉर्मुला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होईल,’ अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी प्रसंगी बोलताना उद्धव यांनी भाजप-शिवसेना युतीबाबतच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ‘नाणारचं जे काही व्हायचं आहे, ते आधीच झालेलं आहे. ‘आरे’बाबतची शिवसेनेची भूमिका लोकभावनेला धरूनच आहे. त्यामुळं युतीमध्ये गोंधळण्यासारखं काही नाही,’ असंही उद्धव म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचं सांगितलं आहे. भाजपाची निवडणूक समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के युती होईल, मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असं सांगितलं आहे. तसंच युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपा आणि शिवेसना युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे. २२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांना मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगितलं नाही. युतीची जेव्हा घोषणा होईल तेव्हा सोबत जो कोणी केंद्रीय मंत्री असेल ते पत्रकार परिषदेत असतील असं त्यांनी सांगितलं.

उद्धव म्हणाले युतीचा फॉर्मुला लोकसभेलाच ठरला; चंद्रकांत दादा म्हणतात कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही