जळगाव: सिंचन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने आयोजित पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्र पुरस्कार सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.
पवार-ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी आहे आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आमचं बरं चाललंय’ असाच संदेश आज दिला.
दरम्यान, आपण मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी का स्वीकारली याचाही उलगडा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ”उद्धव हे तू करणार नसशील तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली. २५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो. त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला.”
“हिंमत असेल तर महाविकास आघाडीचं उद्या कशाला आजच पाडून दाखवा असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. इतकंच नाही तर ऑपरेशन लोटस काय तुम्हालाच लोटलं ना लोकांनी” असं म्हणून भाजपाच्या ऑपरेशन लोटसचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे सरकार फार काळ टीकणार नाही अशी टीका भाजपाने वारंवार केली असल्याने मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं.
Web Title: Story CM Uddhav Thackeray talked over NCP Congress and Shivsena Mahavikas Aghadi Government.
