मुंबई: फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेत जी कामे झाली ती चौकशीस पात्र असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
ते पुण्यात बोलत होते. महाविकास आघाडीच्या सरकारवर ‘स्थगिती सरकार’ म्हणून होणारे आरोप पाटील यांनी फेटाळले. ‘आमच्या सरकारने कशालाही स्थगिती दिलेली नाही. जलसंधारण खात्याच्या कामांनाही स्थगिती दिलेली नाही. कोणत्याही मागच्या योजनांना स्थगिती देण्यात आलेली नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार जाण्याच्या दोन महिने अगोदर निधीचे वाटप हे स्वत:च्या सोयीच्या कार्यकर्त्यांसाठी करण्यात आले, त्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. गरज बघून त्यापैकी काहींवरील अंशत: बंदी उठविण्यात आली आहे,’ असं पाटील यांनी सांगितलं.
‘जलसंधारणाची कामे चालू राहतील. जलयुक्त शिवार हे अनेक काम एकत्र करून दिलेलं गोंडस नाव होतं. काही तकलादू कामे झाली. अत्यंत सुमार कामे झाली त्याबद्दल आम्हीही तक्रार केली होती. श्वेतपत्रिका काढण्याचा विचार नाही.सगळ्या गोष्टी श्वेतपत्रिकेतून येतील असे नाही, वेगवेगळ्या पत्रिकेतून येतील’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जलयुक्त शिवार फडणवीसांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेतून अनेक जिल्ह्यांना फायदा झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. मात्र या योजनेचे नाव बदलण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार करत असून, यावर सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सूत्रांनी दिली होती.
Web Title: Story Minister Jayant Patil attacks former CM Fadnavis Governments over Jalyukta Shivar Scheme.
