मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप बहुमताने पुन्हा देशात सत्तेत आली आहे. त्यात राज्यात भल्या भल्या दिग्गजांचे पराभव झाले आहेत. मात्र असेच पराभव देशभरातील दिग्गज नेत्यांचे झाल्याचे देखील सिद्ध झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाळा संपताच विधानसभा निवडणुका लागणार असल्याने विरोधी पक्षांकडे फारच कमी वेळ असणार आहे. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

त्याच धर्तीवर आवाज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. दरम्यान या भेटीमागील अधिकृत माहिती देण्यात आली असली तरी लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक हेच मुख्य कारण असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे आणि त्यामुळे राज्यात काँग्रेस वगळून इतर पक्षांनी एकत्र येऊन चाचपणीस सुरुवात केल्याचे समजते. त्यातीलच आजची ही भेट असावी असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी काढला आहे.

राजू शेट्टी हे शेतकरी आंदोलनातील नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत आणि काही महिन्यांपासून मनसेने देखील शेतकऱ्यांशी संबंधित विषयाला अनुसरून राज्यभर अनेक आंदोलनं केली आणि ती यशस्वी देखील केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही शक्यता या दोन दिग्गज नेत्यांनी पडताळून पाहण्यास सुरुवात केल्याचा अंदाज बांधण्यात येतं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राज ठाकरेंची भेट