सोलापूर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपसात फिक्सिंग आहे असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आयसिसचा काही संबंध आहे का? ते मोहन भागवतांनी सांगावं असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आरएसएस’वर कठोर शब्दात निशाणा साधला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, या भेटीमागे दुसरे कोणतेही अर्थ काढू नका भेट कारण सहजच घेतली भेट होती आणि त्यामागे कोणतंही राजकारण नव्हतं असंही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची पंढरपूर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. इम्रान खान यांनी शांततेसाठी मोदी पुन्हा येणे गरजेचे आहे असे वक्तव्य केले होते. हे योग्य आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आंबेडकर म्हणाले ,पुलवामाची माहिती केंद्र सरकारला आधीच होती. परंतु केंद्राने त्यासंदर्भात योग्यती दक्षता घेतली नाही. इम्रान आणि मोदींचे एकदाही पटले नाही आणि पुढेही पटेल असे वाटत नाही. हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारची मॅच फिक्सिंग आहे असा थेट आरोप त्यांनी केला. तर पुढे जाऊन याबाबत आता मोहन भागवत यांनी आरएसएस आणि आयसिसचा काही संबध आहे का ? ते स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले.
दरम्यान,सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या बाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, शिंदे एका ठिकाणी प्रचार करून थांबले होते. त्या ठिकाणाहून मी सुद्धा आलो मात्र आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा या भेटीदरम्यान झाली नाही. काही मिनिटात ते एकीकडे गेले आणि मी माझ्या मार्गाने गेलो. साधी भेट झाली आमची असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
