पिपरी : संत तुकोबांच्या देहूतील इंद्रायणी नदीत प्रदूषणामुळे हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. केवळ १५ दिवसांवर आषाढी वारी आली असताना असे प्रकार घडू लागले आहेत. अशातच एवढ्या मोठ्याप्रमाणात मृत मासे आढळल्याने स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि निसर्ग प्रेमिंनीसुद्धा नद्यांच्या प्रदूषणावर संताप व्यक्त केला आहे. ‘रान जाई’ या समाजसेवी संस्थेचे सदस्य रविवारी सकाळी ७ वाजता जलपर्णी काढण्यासाठी आले असता, त्यांना हे मृत मासे आढळून आले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मृत मासे काढण्याच काम सुरू होते.
प्रसार माध्यमांना प्राप्त झालेल्या वृत्तानुसार, देहूनगरीतील इंद्रायणी नदीत तब्बल १५,००० च्या जवळपास मृत मासे आढळले आहेत. रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास रानजाई संस्थेचे सोमनाथ आबा मसूडगे हे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी काही सदस्यांसह आले होते. तेव्हा, त्यांना नदीमध्ये मृत मासे आढळले. सकाळी ७ वाजेपासून १०० ते १५० व्यक्ती सायंकाळी ६ पर्यंत हे मृत मासे नदीतून बाहेर काढत होते. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. सदर धक्कादायक घटनेमुळे नदीचे पावित्र धोक्यात आले असल्याची भावना व्यक्त होत आहे. आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी येथील इंद्रायणी नदीत स्नान करत असतात. परंतु, या प्रकारामुळे नदीत मैलायुक्त सांडपाणी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पोलिसांकडून पंचनामा झाल्यानंतर मृत माश्यांवर पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. २० वर्षांपूर्वी अशाच प्रकारे इंद्रायणी नदीत मृत मासे आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या प्रकरणाचा छडा लावून यास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई होणार का? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान सरकार नद्यांच्या प्रदूषणावर जनजागृती करण्याच्या नावाखाली ‘रिव्हर अँथम’ काढून, केवळ स्वतःचे वैयक्तिक आणि कौटुंबिक चोचले पूर्ण करण्यात रममाण आहे, मात्र नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही जमिनीवरील हालचाली किंवा उपक्रम राबवताना दिसत नाही, अशी तीव्र भावना देखील निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबई असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, नद्यांची अवस्था प्रदूषणामुळे अत्यंत दयनीय आहेत हे वास्तव आहे.
