मुंबई: वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून यावेळी काही ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. सीएए, एनआरसी आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई हिंसक वळण लागले. चेंबूर परिसरात एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बस चालक जखमी झाला आहे. चेंबूर स्वस्तिक पार्क येथे सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस क्रमांक ३६२ धावत असताना बसच्या पुढील काचेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसची मोठी काच फुटली. बस चालक विलास दाभाडे (वय ५३) यांच्या दोन्ही हातांना काचेचे तुकडे लागले. यामुळे ते जखमी झाले असून त्यांच्यावर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत कोणीही प्रवासी जखमी झाले नाही.

या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. चेंबूर, सोलापूर येथे बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे. चेंबूर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र हे कार्यकर्ते वंचितचे नव्हते. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते त्यांनी ही दगडफेक केली असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

 

Web Title:  Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar Maharashtra Bandh.

शांततेच्या मार्गाने बंद करण्याचं प्रकाश आंबेडकर यांचं जाहीर आवाहन