बीड : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्याच्या जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. रविवारी सकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा परभणीहुन बीड जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी बीडमध्ये नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलताना शेतकऱ्यांविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही अस विधान केले आहे.

शिवसेनेत मेगा भरती नव्हे तर ‘स्कील’ भरती सुरू आहे, अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेनेमध्ये काम पाहून प्रवेश दिला जातो, असे प्रतिपादनही आदित्य ठाकरे यांनी केले. बीड शहरातील अद्ययावत नव्या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी ‘मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. जो कर्जमुक्त असेल, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त सुशिक्षित आणि सुरक्षित असेल. शेतकरी बांधवानो आशीर्वाद देणार की नाही असे अवाहन करत तुमचा आशीर्वादच नवा महाराष्ट्र घडवील. सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही. असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

बीड येथे जनआशीर्वाद यात्रेत बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, परवा मुंबईत मला प्रश्न विचारला गेला, भाजप-शिवसेनेत सध्या मेगा भरती सुरू आहे. तेव्हा मी म्हणालो, शिवसेनेत मेगा भरती नव्हे तर स्कील भरती सुरू आहे. काम करणाऱयांना त्याचे काम बघूनच शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जातो, असे ते म्हणाले. बीड जिह्याचे प्रवेशद्वार असणाऱया गंगामसला येथे आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेथून पुढे ही यात्रा माजलगावकडे निघाली. बीडमध्ये केएसके महाविद्यालयात त्यांचा आदित्य संवाद हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी ५ हजार महिला आणि युवती उपस्थित होत्या. त्यानंतर बीड शहरातील १३ कोटी रुपयांच्या अद्ययावत आणि सुसज्ज नव्या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ आज युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला.

आदित्य ठाकरे म्हणाले, सदैव जनतेची सेवा करणाऱया एसटी बसस्थानकाचा शुभारंभ माझ्या हातून होतो आहे हे माझे भाग्य होय. यावेळी अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, संपर्कप्रमुख आनंद जाधव, आ.राहुल पाटील उपस्थित होते.

सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही: आदित्य ठाकरे