मुंबई : एखाद्या सर्वसामान्य मुंबईकराला रेसकोर्स मध्ये धावणाऱ्या घोड्याच्या ताशी वेगापेक्षा मुंबई लोकलचा वेग आणि वेळ हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. खरं मुंबईकराच आयुष्य जगायचं असेल तर लोकलमधून प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. मुंबई लोकल मेरी जान हे जरी खरं असलं तरी बेस्टच्या बस ही मुंबईच्या रस्त्यांची शान आहे. लोकल हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ह्यात शंका नाही.

पण मुंबई लोकल प्रमाणेच मुंबईचा अविभाज्य घटक आहे ती म्हणजे मुंबईतील बेस्टची बस! गेल्या काही वर्षांपासून बेस्ट बसचे दिवस काही चांगले नाही. असे अनेक अनुभव आपल्याला येतात कि तासंतास बस स्टॉपवर उभं राहिल तर बसचा पत्ता लागणं कठीण! अशा परस्थितीत मग कित्येक प्रवासी एकतर टॅक्सी किंवा रेल्वेचा मार्ग अवलंबतात. त्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे बस वेळेवर न येणे व बसेसची कमी झालेली संख्या. दुसरे आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे बस तिकिटांचे वाढलेले दर. कमीतकमी ८ रु. हा तिकिटांचा असलेला दर व बस वेळेवर न येणे याचा परिणाम म्हणूनच बसच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली.

याखेरीज असाही एक सर्वसामन्यांचा वर्ग आहे जो कितीही उशीर झाला तरीदेखील बसनेच प्रवास करतो. तासभर बससाठी बस स्टॉपवर उभा राहतो, बसचे तिकीट कितीही महाग असले तरीदेखील बसनेच प्रवास करतो. पण आता बेस्टचे चित्र पालटले आहे. काही दिवसांपूर्वीच बेस्टने तिकिटाचा दर कमीतकमी रु. ०५ केल्यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबईभर बेस्टच्या बसेस जोरदार वेगाने धावताना दिसत आहेत. ह्या ०५ रुपयांच्या बदलामुळे बेस्टचे पूर्वीचे दिवस परत आले आहेत असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. बेस्टच्या ह्या निर्णयामुळे डबघाईला आलेली मुंबईची शान आता पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवरून मोठ्या दिमाखात धावणार आहे.

BLOG : ५ रुपये भी बोहोत बडी चीज होती है बाबू!