मुंबई : राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दिवस भरात मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र, यंदा सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरवर्षी हंड्या फोडण्यासाठी चुरस असते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्याने आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.

दहीहंडी आयोजित करणाऱ्या बऱ्याच बडय़ा आयोजकांनी तसेच काही नामांकित पथकांनी माघार घेतल्याने यंदाच्या दहीहंडी उत्सवावर निरुत्साहाचे सावट आहे. उत्सवासाठी केलेली तयारी वाया गेल्याने अनेक गोविंदांमध्ये नाराजीची भावना आहे. कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांबाबत असलेली कर्तव्यभावना जपण्यासाठी यंदाच्या उत्सवातून माघारीचा निर्णय घेतल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मोठय़ा गोविंदा आयोजकांच्या माघारीमुळे उत्सव शांततेत पार पडेल आणि वाहतूक कोंडीही होणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘‘जे लोक दहीहंडीमुळे मोठे झाले तेच आता हंडय़ा रद्द क रत आहेत याची खंत वाटते. अनेक महिन्यांची मेहनत वाया गेल्यामुळे गोविंदांची मने दुखावली गेली आहेत. पूरग्रस्तांना अनेक पथकांनी मदत केली आहे. आयोजकांनी उत्सव रद्द करण्यापेक्षा साधेपणाने, कमी रकमेची बक्षिसे देऊन साजरा करावा. आज दहीहंडी रद्द होत असली तरी काही दिवसांनी गणेशोत्सवावर खर्च होणारच आहे ना?’’ अशी प्रतिक्रिया दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे उपेंद्र लिंबाचिया यांनी दिली आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; मुंबईत दहीहंडी उत्सवातून बडय़ा आयोजकांची माघार