मुंबई : विषय मागील अनेक दिवसांपासून पेटत असताना शिवसेना पुन्हा विषय मनसेकडे जाताच जागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेने पाठवलेल्या स्थलांतराच्या नोटिशीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रश्नी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन भेटीस आलेल्या मासेविक्रेत्यांना दिल्यानंतर, आता शिवसेनेनेला जाग आली आहे. मुंबईतील अनेक विधानसभा क्षेत्रात कोळी समाजाची मतं महत्वाची असल्याने आणि विधानसभा निवडणुकीत पारंपरिक मतदार नाराज होऊ नये म्हणून शिवसेनेने विषय मनसेकडे जाताच धावपळ सुरु केली आहे.

कारण सदर प्रश्नी मासे विक्रेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ऐरोलीला गेल्यास मासे घेणारी गिऱ्हाईके तुटतील व उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न होऊन उपासमारीची वेळ येईल, अशी भीती महिलांनी व्यक्त केली. मुंबई महापालिकेच्या नोटिशीमुळे अन्याय होत असल्याची भावना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यावर ‘महापालिकेकडून कितीही नोटीसा येऊ देत, परंतु तुम्ही तिथून अजिबात हलायचे नाही,’ असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला होता. यावर तोडगा काढण्यासाठी मी लवकरच पालिका आयुक्तांची भेट घेईन असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान झोपलेले महापौर त्यानंतर पक्षाच्या आदेश येताच जागे झाले असून, मासेविक्रेत्यांना ऐरोलीत न पाठवता त्यांचे मुंबईतच स्थलांतर करण्यात यावे, असे पत्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त प्रवीण परदेशी यांना पाठवलं. क्रॉफर्ड मार्केटवरून थेट ऐरोलीला स्थलांतर होण्याची नोटीस धाडल्यामुळे कोळी बांधवांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळेच शिवसेनेने मासेविक्रेत्यांच्या या प्रश्नात लक्ष घातले आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी थेट पालिका आयुक्त परदेशी यांना पत्र लिहून मासे विक्रेत्यांचे स्थलांतर ऐरोलीत न करता मुंबईतच करावे, असे पत्रात म्हटले आहे.

मुंबईतील कोळी बांधव हे भूमिपुत्र असून, त्यांचे अचानक स्थलांतर केल्यास विभागातील ग्राहकांशी जोडले गेलेले नाते संपुष्टात येईल. या सगळ्याचा परिणाम थेट त्यांच्या व्यवसायावर होऊन आर्थिक चणचण भासल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर येईल. त्यामुळे मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांना स्थलांतरित करण्याचा निर्णय टॅक समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात यावा. तसेच कोळी महिलांना ऐरोलीत न पाठवता त्या विभागातच स्थलांतर करण्यात यावे, असेही महाडेश्वर यांनी पत्रात म्हटले आहे.

मनसे इफेक्ट! मासेविक्रेत्यांचं स्थलांतर मुंबईतच करावे म्हणून महापौरांचं पालिका आयुक्तांना पत्र