मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन कोलमडले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 या सहा तासात शहरात सरासरी १००.९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये १३१.४९ मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये १४५.६५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील मिठी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेले असून एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे.

आतापर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मिठी नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बैल बाजारात पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर याठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. तसेच रायगडमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून, कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुण्यातून एनडीआरएफचे दोन पथक पनवेलमध्ये दाखल झाले आहेत.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वेसहित हार्बर मार्गावरील वाहतूकही उशिराने सुरु आहे. दरम्यान मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

६ तासात मुंबईत १०० मिमी पावसाची नोंद! १३०० नागरिकांना हलवले