मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये विकोपाचे वाद असले तरी, ठाकरे कुटुंबीयांनी अजून कौटुंबिक जिव्हाळा जपला असल्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेबांप्रमाणेच प्रत्यक्ष निवडणूक लढविण्यात कधीच रस घेतला नसला तरी पुढच्या पिढीला आडकाठी न घालता त्यांना बदलत्या राजकारणात वेगळे निर्णय घ्यावेसे वाटत असतील तर दोन्ही कुटुंब प्रोत्साहन देतील असच काहीस आहे.

आदित्य ठाकरे यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला, ज्याला उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला. त्यात मनसेची ताकद असताना देखील राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवार न देता एकप्रकारे अघोषित पाठींबाच दिला होता. मात्र राज ठाकरे यांनी एका मुलाखतीतील प्रश्नावर दिलेल्या उत्तराने ते पुढच्या पिढीचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या निर्णयाकडे देखील होकारात्मक दृष्टिकोनातून बघत आहेत असं दिसतं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढविण्यावर भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे असो अमित ठाकरे जर त्यांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यांना नाही का म्हणायचं? बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांनी कधीही त्यांचं म्हणणं उद्धव आणि माझ्यावर लादलं नाही. जर आमच्यावर असे संस्कार असतील तर आम्ही मुलांना वाटत असेल तर निवडणूक लढवावी तर त्यात गैर नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी आदित्यच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

एका हिंदी चॅनेलवर मुलाखत देताना राज ठाकरे म्हणाले की, मागील ५ ते १० वर्षात सरकारला विरोधी पक्ष आम्हीच रस्त्यावर उतरून विरोध केला होता. त्यामुळे आमच्यावर इतक्या केसेस पडल्या आहेत? त्यामुळे आम्हाला विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून काम करायचा आहे. माझ्याकडे पर्याय नव्हता असं नाही, मी निवडणूक लढविली नसती, देशाची स्थिती, राज्याची स्थिती आर्थिक डबघाईला आली आहे. म्हणून विरोधी पक्षाची भूमिका घेणं हे हिंमतीचं आहे असं त्यांनी सांगितले.

आदित्य माझ्या मुलाप्रमाणे, तो निवडणूक लढवत असेल तर त्यात गैर काहीच नाही: राज ठाकरे