मुंबई : ईशान्य मुंबईतील उमेदवारी कुणाला द्यायची यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यावरून मोठं वादंग निर्माण झालं. खासदार किरिट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात शिवसेनेला यश देखील आले आहे. पण शिवसेनेने केलेल्या रडीच्या खेळामुळे ईशान्य मुंबईमध्ये युतीने स्वतःचेच हसू करून घेतले आहे. मात्र त्याचा फायदा एनसीपीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना होऊ शकतो, असे चित्र सध्या या मतदारसंघात निर्माण झाले आहे.

किरिट सोमय्या हे हुशार व कार्यक्षम खासदार म्हणून त्यांची ईशान्य मुंबई मतदारसंघात ख्याती आहे. मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द, शिवाजीनगर या परिसरात तळागाळातील लोक सोमय्या यांना ओळखतात. या सगळ्या परिसरात त्यांनी स्वतःची कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली असून मागील वीस वर्षांत त्यांनी ती जाणीवपूर्वक जपली आहे. पण तरी देखील शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना आपली उमेदवारी गमवावी लागली. किरिट सोमय्या यांची जशी तळागाळात ओळख आहे. तशीच ओळख संजय दिना पाटील यांची देखील आहे. संजय पाटील यांनी यापूर्वी आमदार व खासदार म्हणूनही येथून प्रतिनिधित्व केले आहे. मराठी, दलित, आगरी कोळी अशा मतदार वर्गामध्ये पाटील यांची ताकद जास्त आहे. त्यातच मनसेने पाटील यांना जाहीररित्या पाठिंबा दिलेला आहे, तसेच मनसेचं या मतदारसंघात मोठं जाळं असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो.

भारतीय जनता पक्षाने नव्याने उमेदवारी जाहीर केलेल्या मनोज कोटक यांची पोहोच सध्या मुलुंड पुरतीच मर्यादित आहे. मुलुंड बाहेरील ईशान्य मुंबई मतदारसंघात त्यांना कुणीही ओळखत नाही. मुलुंडच्या पलिकडे त्यांना कुणी पाहिलेले सुद्धा नाही. आयत्या वेळी त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बळावरच त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना मोठी अर्थशक्ती कामाला लावावी लागणार आहे. परंतु ती अर्थसंकटी तर संजय दीना पाटील यांच्याकडे देखील आहे आणि विशेष म्हणजे आक्रमक कार्यकर्त्यांची फौज जी संजय दीना पाटलांकडे आहे ती ना सेनेकडे आहे, ना मनोज कोटक यांच्याकडे अशी परिस्थिती आहे.

उमेदवारी देण्यावरून शिवसेनेने इतकी खालची पातळी गाठली की, या उमेदवारीचे हसे झाले आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्तेही मनोज कोटक यांचे काम किती ताकदीने करतील याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे. संजय दिना पाटील यांची उमेदवारी १० दिवसांपूर्वीच जाहीर झाली होती. त्यापूर्वी या मिळालेल्या कालावधीत त्यांनी आपली प्रचार यंत्रणा पूर्णपणे बांधून काढली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात झाली आहे. प्रचाराचे नियोजन करण्यास भरपूर कालावधी मिळाल्याचा फायदा संजय दिना पाटील यांना होऊ शकतो. मनोज कोटक यांची उमेदवारी आयत्या वेळी जाहीर झाली. त्यामुळे त्यांची प्रचार यंत्रणा सज्ज करण्यास वेळ लागू शकतो. कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, त्यांना कार्यतत्पर करणे यातच बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपमधील या सावळ्यागोंधळाचा फायदा संजय पाटील यांना होईल असेही सांगण्यात येत आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अर्थात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना?