मुंबई: काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असं आजच अभिनेत्री आणि खासदारकीला उभ्या राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी जाहीर केलं. या राजीनाम्यावरुन आता मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात जुंपली आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी योग्यच गोष्टी मांडल्या आहेत असं म्हटलं आहे. काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष म्हणून मी उर्मिला मातोंडकर यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

यावर्षी २७ मार्च रोजी मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव आहे. बॉलिव़ू़डमधून अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करतात. तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहू नका.

मी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेससोबतच असणार आहे, असे त्या पक्षप्रवेशादरम्यान म्हणाल्या होत्या. मात्र सहा महिनेही त्या पक्षात राहू शकल्या नाहीत. आज त्यांनी तडकाफडकी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना १६ मे रोजी पत्र पाठवले होते. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. उलट पत्रातील गोपनीय माहिती उघड करण्यात आली, त्यामुळे त्या नाराज होत्या.

उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली