मुंबई : ईशान्य मुंबईतील शिवसेना आणि किरीट सोमैयांच्या वादानंतर अखेर किरीट सोमैया यांचा पत्ता कट होऊन मुलुंड मधील स्थानिक नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्याची वेळ भाजपवर आली. प्रचार शिगेला पोहोचला असताना अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना स्थानिक मतदारांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आधीच शिवसेना आणि भाजपचा अंतर्गत वाद असल्याने त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना होणार अशी शक्यता आहे. त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत संजय दीना पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या फौजेत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील झाल्याने त्यांची प्रचार यंत्रणा दुप्पट झाली आहे. तसेच अनेक स्थानिक भाजप आणि शिवसेनेचे गट छुप्यामार्गे संजय दीना पाटील यांना मदत करत आहेत, असं वृत्त आहे.

त्यात मुलूंड आणि आसपासच्या गुजराती वस्त्यांमध्ये देखील संजय दीना पाटील यांना गुजराती समाजाचे प्रतिनिधि मदत करत आहेत, त्यामुळे मनोज कोटक यांची पंचायत झाली आहे. विशेष म्हणजे हिंदुत्वाच्या अजेंडयावर स्वार झालेल्या भाजपाला धड हिंदू मतं तरी मिळतील याची शास्वती देता येणार नाही. कारण इथला हिंदू म्हणजे मराठी, उत्तर भारतीय आणि गुजराती समाज देखील संजय दीना पाटील यांना मोठ्याप्रमाणावर पाठिंबा देताना दिसत आहे. तसेच ईशान्य मुंबईतील मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार हे मोठ्या प्रमाणावर एकगठ्ठा संजय दीना पाटील यांना मदत करतील यात शंका नाही. त्यात या मतदारसंघातील शीख मतदार देखील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादीला मतदान करण पसंत करतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. परिणामी संजय दीना पाटील यांना प्रचार रॅली दरम्यान गल्लोगल्ली मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

ईशान्य मुंबईत संजय पाटील यांना मिळणारा पाठिंबा भाजपसाठी धोक्याची घंटा?