मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अखेर १ मे पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय रद्द केला आहे. हा निर्णय घेतल्यापासून सर्वच थरातून टीका होत होती आणि अखेर राज्य सरकारला नमतं घ्यावं लागलं.

परंतु या निर्णयाची गरज भासल्यास राज्य सरकार पुढच्यावर्षी याचा पुन्हा विचार करू शकत असं ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. प्राधिकरणाचा निर्णय अधिकाऱ्यांना बोलावून रद्द केला जाईल असं हि त्यांनी सांगितलं.

वर्षभराचा अभ्यास आणि परीक्षा संपल्यानंतर लगेचच मामाच्या गावाला जाण्याची हुरहूर सर्वच बच्चे कंपनीला असते. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयाने सर्वांनाच गावाला जाण्याचा विचार लांबणीवर टाकावा लागणार होता. परंतु राज्य सरकारने पुन्हा हा निर्णय रद्द केल्याने मुलांना आणि पालकांना सुद्धा आनंद झाला आहे.

इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या राज्यमंडळाच्या शाळा १ मे पर्यंत सुरु ठेवाव्यात असे निर्देश सर्वच शाळांना विद्या प्राधिकरणाने दिले होते. परंतु राज्य सरकारने तूर्त हा निर्णय रद्द केला असून, पुढच्या वर्षी त्याचा विचार करू शकतो असे म्हटले आहे. सरकारच्या त्या निर्णयामुळे पालक संघटना, शिक्षक आणि विद्यार्थी असे सर्वच नाराज होते. अखेर तो निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावा लागला आहे.

Now all state school will opens till 1 may has been cancelled by Vinod Tawde