मुंबई: याच महिन्यात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आणि सर्व बँक खातेदारांची धाबेच दणाणले. त्यानंतर सर्वत्र केंद्र सरकारबद्दल प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. त्यानंतर संतापलेल्या खातेदारांनी केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री ते भाजप आणि सेनेच्या अनेक नेतेमंडळींची भेट घेऊन सरकारला जाब विचारला होता. मात्र बँक खातेदारांच्या वाट्याला आश्वासनांशिवाय काहीच आलं नसल्याने त्यांचा संताप अजूनच दुणावतो आहे.
त्यामुळे हतबल झालेले पीएमसी बँकेचे खातेदार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. मुंबईतील सर्वच सभांमध्ये राज ठाकरे यांनी पीएमसी बँकेच्या गैर व्यवहारावर भाष्य करत त्याबद्दल सरकारला खडे बोल सुनावले होते. तसेच त्यांनी काही महिन्यांपूर्वीच अर्थव्यवस्थेत असे भयंकर दुष्परिणाम दिसतील याची कल्पना सामान्यांना दिली होती. मोदी सरकारचे नोटबंदी आणि जीएसटी’सारखे निर्णय देशाची मोठी हानी करतील यावर त्यांनी अनेकदा भाष्य केलं आहे.
कालच्या सभेतील भाषणात त्यांनी सरकारवर आरोपही केला की या सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून तब्बल १ लाख ७० हजार कोटी सरकार चालवण्यासाठी काढले. या सगळ्यावर आता खातेदार हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता पीएमसीच्या खातेदारकांना काही सूचना देत मार्गदर्शन करतील आणि सरकारप्रती मतदाराने कडक पावलं उचलणं गरजेचं आहे याची देखील ते त्यांना आठवण करून देतील अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
अडचणीच्या काळात बँका वाचवण्यासाठी रिजर्व बँकेत असलेले पैसे वापरले तर बँकांचे काय होणार? असा सवालही उपास्थित केला जातोय. या पार्श्वभूमीवर आज पीएमसी खातेधरकांना नेमका राज ठाकरे काय दिलासा देतात, हे पाहावं लागेल. दरम्यान, गुरुवारी मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. सप्टेंबर महिन्यात या बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले. त्यामुळं खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
