मुंबई : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना त्यांचे वर्तन हे खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे असा कोणता गंभीर गुन्हा त्यांनी केला होता की त्यांचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल असा निर्णय घेण्यात आला.
पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांनी पगार वेळेत मिळत नसल्याने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागितली होती. त्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पेलविण्यात आर्थिक दृष्ट्या अडचण येत होती. त्यामुळे विषयाचे गांभीर्य वरिष्ठांना कळावे म्हणून त्यांनी उपहासात्मक शब्द प्रयोग करून पोलीस आयुक्त दत्ता पडसलगिकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सनदशील मार्गाने पत्र व्यवहार करून विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्नं केला होता.
ज्ञानेश्वर अहिरराव हे व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षा बंदोबस्तावर असतात आणि ते मुंबईतील माहीम येथील पोलीस वसाहतीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी व लहान मुलगी आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोजा असल्याने ते परत फेड करण्यासाठी वेळेवर वेतन मिळणे, हाच एक महत्वाचा विषय उरतो. परंतु त्यांना वेतन वेळेत न मिळाल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आर्थिक कोंडी होत होती. केवळ वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यामागील गांभीर्य वरिष्ठांच्या निदर्शनास आणण्याचा उद्देशाने, त्यांनी आपल्यावर काय वेळ आली आहे हे अधीरेखित करण्यासाठी ‘वर्दीत भीक मागण्याची’ परवानगी द्यावी असं म्हटलं होतं.
कनिष्ठांच्या व्यथा समजून घेणं तर दूर, उलट वरिष्ठांनी वेगळ्याच दृष्टीकोनातून विषयाकडे बघून हाताळल्याचे निदर्शनास येत आहे. आज त्यांना निलंबित करण्यात आले असून, सरकारच्या या निर्णयाने त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अजूनच बिघडू शकते असं काहीस चित्र आहे.
