मुंबई : महाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. अशातच मुंबईतील मुख्यमंत्री बंगल्यावर म्हणजेच वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली आहेत.

‘भिंतीलाही कान असतात.’ अशी एक म्हण आहे. त्यामुळं एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चार भिंतीच्या आत बोलतानाही काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील द्वेषाचं राजकारण इतकं टोकाला गेलं आहे की त्यासाठी आता थेट भिंतींचाच आधार घेतला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वर्षा बंगल्याच्या भिंतीवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणावरून हेच दिसून आलंय.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला रिकामा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यात राहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. वर्षा बंगला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या विभागाचे काही अधिकारी या बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करणारी वाक्य आढळून आली आहेत. या प्रकारामुळे शिवसेना-भाजप मधील शाब्दिक वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना सगळं समजतं अशी प्रतिक्रिया, शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर भिंतींवर अशी वाक्य कुणी आणि का लिहिली, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वर्षा बंगल्यातील व्हिडीओ कुणी शूट केला आणि तो बाहेर कसा आला याची माहिती अद्याप समोर आलेला नाही. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता राजकारण सुरु झालं आहे. दिविजाच्या रुममधील हा व्हिडीओ आहे, असं बोललं जात आहे. व्हिडीओबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

 

Web Title:  Politics on sentences wrote on walls of Varsha Niwas Bungalow Devendra Fadnavis on CM Uddhav Thackeray.

अपरिपक्वपणा!  वर्षा बंगला सोडताना देखील भिंतीवर ‘विकृत-प्रवृत्ती’ दर्शन?