मुंबई : मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणून अपयशी ठरलेले उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांनी मराठी माणसाचा कैवार घेतल्याचे आठवत नाही. त्यांनी केवळ उत्तर भारतीयांना तसेच हिंदीलाच पाठींबा दिला आणि काँग्रेसला त्यांच्या दावणीला बांधले. यामुळे आता त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मराठी माणसांची मते मिळावी म्हणून त्यांना आता मराठी सिनेकलाकारांना प्रचारासाठी आणावे लागत आहेत, नाहीतर मराठी मतदार प्रचार रॅलीकडे बघणार सुद्धा नाही याची त्यांना जाणीव आहे. तसेच हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जेथे मनसेने काँग्रेसला समर्थन दिलेले नाही. परिणामी त्याचा फायदा शिवसेनेच्या गजानन कीर्तिकारांना होण्याची दाट शक्यता आहे.
‘बिग बॉस’ कार्यक्रमात मोठी रक्कम घेऊन सहभागी झालेले मराठी कलाकार रेशम टिपणीस, पुष्कर जोग, सई लोकूर आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांना घेऊन निरुपम यांनी रोड शो केला. ‘कोण म्हणतो मराठी माणूस संजय निरुपमसोबत नाही? आम्ही आहोत’ अशी या कलाकारांची पोस्टर काढली. पण मुंबई अध्यक्ष असताना मराठी माणसांसाठी एकाही विषयावर संजय निरुपम लढले नाहीत. त्यामुळे आता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत.
विशेष म्हणजे स्वतःला मराठी माणसाचा पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी ‘कोण म्हणतो मराठी माणूस संजय निरुपमसोबत नाही? आम्ही आहोत’ अशी या कलाकारांची पेड पोस्टर काढली गेल्याच प्रसार माध्यमांना समजलं आहे. त्यात समाजवादी पक्षाने येथे तगडा उमेदवार दिल्याने पंचायत झाली आहे. तसेच उत्तर भारतीय उमेदवार मोठ्या प्रमाणावर सेनेकडे जाऊ शकतात आणि त्यामुळे संजय निरुपमांचा मार्ग कठीण असल्याचं म्हटलं जात आहे. जर या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला तर ते काँग्रेसमध्ये राजकारणातून बाजूला फेकले जातील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
